पिंपरी-चिंचवड : दगडोबा चौक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असून यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महानगरपालिकेकडून नियमितपणे कचरा उचलण्याची व्यवस्था असतानाही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करून रात्री-अपरात्री तसेच पहाटेच्या वेळी या ठिकाणी कचरा आणून टाकला जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महापालिकेची कचरा संकलन वाहने दररोज या भागात येतात. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची सुविधा उपलब्ध असतानाही काही जण जाणूनबुजून सार्वजनिक जागेवर कचरा फेकत आहेत. परिणामी परिसरात अस्वच्छता वाढत असून दुर्गंधी, डास आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा सर्वाधिक त्रास परिसरातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार बहुतांश वेळा रात्री उशिरा किंवा पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही भाडेकरू, बॅचलर युवक-युवती तसेच कामावर जाणाऱ्या व्यक्तींकडून कचरा आणून येथे टाकला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे दिवसभर स्वच्छ दिसणारा परिसर सकाळी पुन्हा कचऱ्याने भरलेला दिसतो.
या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिसरातील काही जागरूक नागरिकांनी संबंधित ठिकाणी रातोरात एक लक्षवेधी फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर “येथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये” अशी विनंती करतानाच उपरोधिक भाषेत कचरा टाकणाऱ्यांना टोला लगावण्यात आला आहे. कचरा टाकल्यास घरातील सदस्यांबाबत विनोदी स्वरूपातील शापवजा मजकूर लिहून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हा फ्लेक्स सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ जनजागृती करून हा प्रश्न सुटणार नाही. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांची ओळख पटवावी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच वारंवार कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणांवर विशेष पथकांकडून देखरेख ठेवण्याची गरज असल्याची मागणीही होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी लावलेला हा फ्लेक्स म्हणजे परिसरातील वाढत्या अस्वच्छतेविरोधातील एक प्रकारचा निषेध मानला जात आहे. स्वच्छ शहराचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे असून, प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच अशा समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, अशी भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
