पिंपरी चिंचवड :- वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी या पवित्र भूमीला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी आळंदी येथे, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य आणि वैकुंठगमन देहू येथे झाले आहे. या दोन्ही ठिकाणांमधील १६ किलोमीटरचा परिसर वारकरी परंपरा, अध्यात्म आणि संत साहित्याने समृद्ध आहे. लाखो भाविकांचे हे अत्यंत श्रद्धेचे केंद्र असल्याने, या परिसराचे जतन आणि गौरव करणे काळाची गरज असल्याचे आमदार जगताप यांनी पत्रात नमूद केले आहे.
उत्तराखंडच्या धर्तीवर मागणी…
उत्तराखंड राज्याने ज्याप्रमाणे आपल्या परिसराचा ‘देवभूमी’ म्हणून गौरव केला आहे, त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीला ‘संतभूमी’ म्हणून कायदेशीर दर्जा मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वारकरी समाजातून होत आहे. याचा गांभीर्याने विचार करून सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी पत्राद्वारे केली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा गौरव वाढण्यासोबतच, वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.
- “संत ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी वारकरी संप्रदायाचा श्वास आहे. या परिसराचा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपणे ही काळाची गरज असून, ‘संतभूमी’चा दर्जा ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असेल.”उत्तराखंडच्या धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करणे, हे महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा सन्मान ठरेल. यामुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या क्षेत्राचा सर्वांगीण गौरव वाढेल.” – आ. शंकर जगताप, चिंचवड विधानसभा…
